Prasad Chaudhari

Content :- नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपणास नवरात्रीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या नवरात्रीला मी आणि संजय मसनकर आम्ही दोघांनी मिळून देवीचा मार्मिक असा गोंधळ कुठलेही प्रकारचे इक्यूपमेंट जवळ नसताना रेकॉर्डिंग केला आहे तरी आपण आमच्या पहिल्या प्रयत्नाला सबस्क्राईब रुपी आशीर्वाद देऊन आमच्या हक्काच्या शुभेच्छा मागत आहोत गाण्याचे बोल माझेच आहे तर संजय मसनकर यांनी गायले आहे आपल्या जवळच्या सर्व व्यक्तींना व ग्रुपला गाण्याची लिंक शेअर करून सहकार्य करावे


दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामीनंतर, १९४७ ला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तेव्हा नवीन सरकार आणि त्या सरकारमधील मंत्र्यांपुढे एकच जटिल प्रश्न उभा होता, तो म्हणजे भारतीय एकात्मतेसाठी ५६२ संस्थाने कशी विलीन करून घ्यावीत... अखेर साम-दाम-दंड-भेद हे धोरण वापरून सुमारे ५६२ संस्थाने भारतात विलीन करण्यात तत्कालीन सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून मोठ्या कष्टाने यश मिळवले, कारण देशाची सर्वाधिक संपत्ती या संस्थानांकडे होती. आपण स्वतंत्र राजे म्हणून राज्य करावे असे त्या संस्थानिकांना वाटत होते, देशाच्या मालमत्तांवर आपलेच वर्चस्व दीर्घकाळ टिकून राहावे, हा त्यामागील हेतू होता; पण आपल्या मुत्सद्दीपणाच्या आणि बुद्धीचातुर्याच्या भरवशावर या संस्थांना एकत्रित आणून, त्यांचे अखंड भारतात विलीनीकरण करून या संस्थानांना स्वतंत्र भारताचा एक भाग बनवून लोकशाहीची स्थापना झाली, यानंतरच ‘स्वतंत्र संघराज्य’ निर्माण होऊन सर्व संपत्ती लोकशाही भारताजवळ आली, हा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

          त्यानंतर हळूहळू रेल्वे, बँका, कारखाने, सार्वजनिक कंपन्या इत्यादींचे राष्ट्रीयीकरण झाले आणि एक शक्तिशाली भारत निर्माण झाला; परंतु ७० वर्षांनंतर पुन्हा आपले वर्तमान सरकार उलट्या दिशेने प्रवास करताना दिसत आहे. आता भांडवलशाही व्यवस्थेच्या खांद्यावर स्वार होऊन फॅसिस्ट शक्ती राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदल घडवण्याचे ढोंग करीत आहे. निव्वळ स्वार्थासाठी हे सरकार देशाला पुन्हा १९४७ पूर्वीच्या कालखंडातील काळोखात ढकलू इच्छित आहे, म्हणजेच देशाची संपत्ती पुन्हा नव्या संस्थानांकडे पर्यायाने भांडवलशाही साम्राज्याच्या हाती देण्याचा घाट घातला जातोय, ही देशाला पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याची तयारी नव्हे तर दुसरे काय...!

           मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सार्वजनिक मालमत्ता किंवा सार्वजनिक कंपन्यांच्या खासगीकरणाच्या नावाखाली देशाची सर्व संपत्ती येथील काही मोजक्याच भांडवलदारांच्या घशात घालण्याचा व त्याद्वारे पुन्हा ‘राजा आणि गुलाम’ ही मोगलकालीन व्यवस्था प्रत्यक्षात राबविण्याचा दुष्ट हेतू दिसून येतो आहे!

            हे असे जर चालू राहिले तर मी लिहून देतो, की येत्या काही वर्षांत भारतीय लोकशाहीचे अस्तित्व पूर्णपणे संपून जाईल व देश भांडवलदारांच्या नियंत्रणाखाली असेल जे नव्या संस्थानिकांच्या रूपात उदयास येतील. कदाचित हे उद्योगपती-भांडवलदार भविष्यात जुन्या राजांपेक्षाही अधिक निर्दयी आणि कठोर असतील! मग निश्चितच ज्याच्याकडे ‘अर्थव्यवस्थे’ची काठी असेल, ‘लोकशाहीची म्हैस’ त्याचीच असेल. सार्वजनिक मालमत्तेची मालकी भविष्यात फक्त काही मूठभर भांडवलदारांकडे राहील. केंद्र सरकारचे सध्याचे धोरण आणि हेतू देशाला त्याच दिशेने घेऊन जात असल्याचे दिसते. कारण हे धनकुबेर मोफत वैद्यकीय रुग्णालये किंवा धर्मशाळा तर निश्चितपणे बांधणार नाहीत! याउलट हे उद्योगपती नफेखोरीचा धंदा वाढविण्यासाठी केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे रक्त शोषून घेतील! बोलण्यासाठीच केवळ लोकशाही राहील; पण प्रत्यक्षात ती अदृश्य गुलामगिरी असेल!!

            म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, की खासगीकरण ही एक व्यवस्था नसून, ती देशाच्या सार्वजनिक मालमत्ता-कंपन्यांचे पुन्हा संस्थानीकरण करण्याची तयारी आहे. काही वर्षांनंतर, तेच सत्ताधारी तुम्हाला (जनतेला) सांगतील की आता देशात सरकारी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये यांचा कोणताही उपयोग नाही. त्यामुळे, ते देखील खासगी भांडवलदारांच्या हातात द्यायला पाहिजेत! अशा स्थितीत विचार करा की मग सर्वसामान्य, गरिबांचे आणि असंघटित जनतेचे काय हाल होतील? जर देशातील सामान्य जनता खासगी शाळा आणि रुग्णालयांच्या लुटीच्या व्यवस्थेवर समाधानी असेल, तर रेल्वेला खासगी हातात सोपवण्यात काय हरकत आहे? तसेही या क्षेत्रांचे हळूहळू खासगीकरण केले जातच आहे.  वास्तविक आम्ही लोकशाही मजबूत करण्यासाठी सरकारी यंत्रणा स्थापना केली आहे, हे सरकार निवडून दिले आहे, नफेखोरांना सरकारी मालमत्ता विकण्यासाठी नाही!!

            मला एक समजत नाही, की केंद्र सरकार तोट्याची कारणे सांगून सार्वजनिक मालमत्ता का विकत आहे?  जर व्यवस्थापन योग्य नसेल तर सरकारने ते दुरुस्त करावे. ते विकणे, हात झटकणे किंवा जबाबदारीपासून दूर पळून जाण्याने भागणार आहे का? दुसरी महत्त्वाची बाब ही की या सार्वजनिक कंपन्या तोट्यात आहेत तर मग हे उद्योगपती त्या का विकत घेत आहेत, आणि त्यातील काही नफ्यात आहेत, तर मग सरकार त्या का विकत आहे? माझे तर स्पष्ट मत आहे, की हा एका मोठ्या षड्यंत्राचाच भाग आहे आणि हे सगळे पूर्वनियोजित आहे. हे षड्यंत्र असे आहे, की प्रथम सरकारी संस्थांना योग्यरित्या काम करू देऊ नये, नंतर त्यातील उणीदुणी काढायची, जेणेकरून कोणीही खासगीकरणावर आवाज उठवणार नाही, नंतर हळूहळू ही सर्व सरकारी संपत्ती खासगी भांडवलदारांना विकून टाकली जाईल, ज्या भांडवलदारांपासून निवडणूक काळात प्रचंड निधी येतो. दूरसंचार म्हणजे बीएसएनएल हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

            सर्वसामान्य गरीब कामगार, शेतकरी कधीही पक्षांना निधी देत नाहीत. भांडवलदारांपासून राजकीय पक्षांना प्रचंड निधी येतो! आणि कोणताही भांडवलदार-उद्योगपती हा पैसा कधीही दान देत नाही, वास्तविक तो गुंतवणूक करीत असतो, जेणेकरून निवडणुकीनंतर सरकारच्या मदतीने अमर्याद नफा कमावता येईल!

            मी मांडलेल्या वरील मुद्यांवरून...

            हे तर स्पष्ट आहे की हे सरकार, आज पुन्हा, देशाला त्यांच्या काही मोजक्या गुजराती उद्योगपती मित्रांचा गुलाम बनवण्याची तयारी किंवा प्रयत्न करत आहे! देशाच्या विकासासाठी ७० वर्षांत स्थापन केलेल्या सरकारी संस्था विकल्या जात आहेत आणि खरेदीदार हे केवळ ‘दिल्लीश्वरां’चे खासगी उद्योगपती मित्र आहेत. दररोज देशातील सुशिक्षित तरुणांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. बेरोजगारी, महागाई शिगेला पोहचली आहे आणि हे शासक रोमचा राजा नीरो सारखे बासरी वाजवत आहे आणि देशाचा सत्यानाश उघड्या डोळ्याने पाहताहेत...!

            हे खरे आहे, की या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आजकाल देशात मंदीचे वातावरण आहे. सरकारची तिजोरी रिकामी आहे, सरकारचे दिवाळे निघाले आहे किंवा सरकारने ते नियोजनबद्ध रीतीने काढले आहे; परंतु अशा संकटाच्या काळात सरकारचे धोरण चुकीच्या दिशेने चालले आहे. सरकार म्हणते की मंदीच्या या अवस्थेत खासगी कंपन्यांची आर्थिक स्थितीही चांगली नाही, त्यामुळे ते स्वतः सरकारी मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणणार? याचा अर्थ सरकारी मालमत्ता कवडीमोल किंमतीने विकल्या जाऊ शकतात आणि त्या विकत घेण्यासाठी पुन्हा सरकारी बँकांकडूनच पैसा दिल्या जाईल, ज्यामुळे 'क्रोनी कॅपिटलिझम' (उद्योगपती-शासकांमधील सांगड) होऊ शकते!

            ज्याप्रमाणे इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून आपल्या देशाला गुलाम बनवले होते, त्याच प्रकारे हे सरकार भारतीय अर्थव्यवस्था खासगी कंपन्यांच्या ताब्यात देऊन देशाला पुन्हा गुलामगिरीकडे घेऊन जात आहे. दूरसंचार क्षेत्र, रेल्वे, रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी उड्डाण आणि वीज इत्यादी सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांना खासगीकरणाच्या दिशेने वळविल्या जात आहे, ज्यामुळे बेरोजगारी तर वाढेलच; पण महागाईही शिगेला पोहोचेल! म्हणूनच, केंद्र सरकारने देशहितासाठी सार्वजनिक मालमत्ता विकण्याचा किंवा भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि सत्ताधारी सरकार हे करत नसेल, तर जनतेने त्यांच्यावर दबाव वाढवावा.

            खरं तर, विकासाचे दिवास्वप्न दाखवणे, मोफत लसींचे ढोल पिटणे आणि लसी परदेशात पाठवणे, हजारो कोटींचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तयार करणे, उज्वला योजनेत मोफत गॅस कनेक्शन आणि सिलेंडर तसेच ८० कोटी लोकांना मोफत रेशन (त्यावर आपला फोटो छापून) पेट्रोल-गॅस-डिझेल-सिमेंट-पाईप-आणि प्रत्येक वस्तूंची महागाई वाढवून आणि प्रत्येक वस्तूवर जीएसटी (कर) लावून सर्वसामान्य जनतेचे रक्त शोषण्याचाच हा प्रकार म्हटला पाहिजे. तरीही तिजोरी रिकामीच आहे, म्हणून ते देशाची मालमत्ता विकायला निघाले आहेत. जेव्हा जेव्हा एखाद्या गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाचा खिसा रिकामा होतो, तेव्हा तो कसा तरी घरची मालमत्ता विकून आपले घर किंवा उदरनिर्वाह सांभाळतो; पण नंतर तो कुठलेही नवीन काम करू शकत नाही, नवीन कपडे घेऊ शकत नाही, नवीन वस्तू विकत घेऊ शकत नाही; पण आपल्या देशाच्या बाबतीत सर्व काही उलटे होत आहे.

            एके काळी, ‘देश नही बिकने दुंगा, देश नही झुकने दुंगा’ सारख्या कविता म्हणून मोठ्या बढाया मारणारे आमचे लोकप्रिय (?) राज्यकर्ते देशाच्या सार्वजनिक मालमत्ता विकण्यास (किंवा भाडेतत्त्वावर देण्यास) उदार झाले आहेत, जेणेकरून सरकारची रिकामी तिजोरी भरता येईल!

            अलीकडेच त्यांनी असेही म्हटले होते की व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही. म्हणून, सरकार काही सार्वजनिक कंपन्या वगळता मोक्याच्या क्षेत्रातील सरकारी युनिट्सचे खासगीकरण करण्यास उतावीळ झाले आहे, कारण सरकारकडे पैसा नाही, सरकार ठणठण गोपाल झाले आहे, म्हणूनच ते देशाची सरकारी मालमत्ता विकून ६ लाख कोटी रुपये उभारण्याच्या नादी लागले आहे.

             लोकांचे रक्त आणि घाम शोषून घेतल्यानंतरही, जेव्हा त्यांना तथाकथित विकास जन्माला घालता आला नाही, तेव्हा दिल्लीश्वरांनी विकासाच्या नावाखाली देशालाच लिलावात काढले आहे; पण अशा विकासाचा काय उपयोग, ज्यासाठी देशाच्या मालमत्ता विकाव्या लागतील!

             सरकारने लोकांचा रोजगार हिरावून घेतला आहे आणि आता ते देशातील सर्व काही विकायला निघाले आहे. केवळ २-३ भांडवलदार मित्रांच्या मदतीने भारतातील तरुणांच्या भवितव्यावर हल्ला चढवला जात आहे. गेल्या ७० वर्षांत देशात जे काही उभारले गेले, ते या सरकारने खासगीकरणाच्या नावावर विकायला सुरुवात केली. आता इथे प्रश्न हा देखील उद्भवतो की जेव्हा ७० वर्षांत देशाचा विकास झाला नाही (हे सध्याच्या सत्ताधार्‍यांनी अनेकदा सांगितले आहे), तर हे लोक विकत असलेली मालमत्ता कुठून आली?  मग दुसरा प्रश्न म्हणजे ४० वर्षे सरकारी मालमत्ता भाडेपट्टीवर दिल्यानंतर काय परिणाम होईल, हेसुद्धा निश्चित नाही. त्याच वेळी, देशातील मालमत्ता विकताना कोणाचा सल्ला का घेण्यात आला नाही? शेवटी देशात काय घडत आहे? सैतानी बहुमत असलेले हे सरकार वाट्टेल तशी मनमानी करीत आहे, असे म्हणावे लागेल. जनतेला लुटून आणि सार्वजनिक मालमत्ता विकून हा देश चालवला जाईल का? याचे उत्तर कोण देणार?

             सरकार सरकारी मालमत्ता खासगी हाताना विकणार असल्याने तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही निघून जातील. प्रश्न असा आहे की, देशाच्या मालमत्ता कोणाला विकल्या जात आहेत? जर सरकार या मालमत्ता फक्त दोन किंवा चार उद्योगपती-मित्रांना विकत असेल, तर हे स्पष्ट आहे की याद्वारे ते देशाच्या मालमत्तांवर काही मोजक्या लोकांची मक्तेदारी निर्माण करत आहे. देशाला पुन्हा गुलामगिरीकडे ढकलण्याचा हा डाव आहे!!

             मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, की अशा मक्तेदारी किंवा खासगीकरणामुळे फक्त काही लोकांना फायदा होईल आणि देश खड्ड्यात जाईल. यावरून असे दिसते, की हे सरकार काही उद्योगपती-मित्रांचे 'कळसूत्री बाहुले' म्हणून काम करत आहे...!

             हे लक्षात घेण्यासारखे आहे की स्वातंत्र्यदिनी, २०१९ आणि २०२० मध्येही पंतप्रधानांनी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नावाखाली १०० लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती आणि या वर्षीही त्यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात त्याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. आता कोणीही हा प्रश्न विचारत नाही की हे शंभर लाख कोटी रुपये दोन वर्षांत कुठे खर्च झाले? जेव्हा लाल किल्ल्यावरून नेत्याने सांगितले की त्यांनी विकास प्रकल्पांवर शंभर लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, तेव्हा प्रत्येकजण हे डोळे मिटून कसे काय स्वीकारू शकतो? किंवा जेव्हा देशाचे एकूण बजेट फक्त ३१ लाख कोटी आहे, तर मग हे शंभर लाख कोटी कुठून आले? आणि कुठे आणि कसा खर्च झाला, हे कोणी का विचारत नाही..?

             जसे आपण ऐकले आहे की २०२२ पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशातील प्रत्येक व्यक्तीला घर मिळेल? या योजनेचे काय झाले? देशातील सर्व गरीब किंवा बेघरांना घरे मिळाली का?

              येथे हे नमूद करण्यासारखे आहे की, गेल्या ७ वर्षांपासून स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत, केवळ घोषणांवर घोषणा केल्या जात आहेत. त्यानंतर २०२२ मध्ये प्रत्येकाला घरे मिळतील अशी बरीच चर्चा होती. आता स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरू झाले आहे. या काळात किती घरे बांधली गेली?, किती लोकांना घरे देण्यात आली आहेत, किती लोक अजूनही बेघर आहेत, किती लोकांकडे पक्की घरे नाहीत आणि सर्वांना घरे देण्याच्या योजनेची स्थिती काय आहे हे कोणालाही माहिती नाही..

              २०२२ पर्यंत, म्हणजेच स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे देखील ध्येय असल्याचे सांगितले गेले होते. यावेळी लाल किल्ल्यावरून त्याचा उल्लेख कोणी ऐकला का? आता स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्यासाठी फक्त ३४३ दिवस शिल्लक आहेत, देश आता आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे; पण शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट तर सोडा, ते २०१४ मध्ये जेवढे होते त्याच्या निम्मे झाले आहे. त्याचवेळी, ८ महिन्यांपासून, दिल्ली सीमेवरील काळ्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे, म्हणजेच शेतकर्‍यांचे शोषण केले जात आहे. मात्र, तालिबान्यांशी चर्चा करू इच्छिणार्‍या सरकारला शेतकर्‍यांशी बोलायला वेळ नाही.

              गेल्या आठ वर्षांत म्हणजेच २०१३ पासून शेतकर्‍यांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. आता तर शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करावे लागेल अशी चर्चाही होत नाही! लाल किल्ल्यावरील भाषणात प्रधानमंत्र्यांनी छोटे शेतकरी हे राष्ट्राचा अभिमान असल्याचे सांगितले होते, मग हे सरकार शेतकर्‍यांसाठी काय काम करेल? जेव्हा शेतकरी राष्ट्राचा अभिमान बनतात, तेव्हा त्यांनी आपले उत्पन्न वाढवण्याची चिंता का करावी! केवळ आणि केवळ खोट्या अभिमानाच्या बाता मारून शेतकर्‍यांची फसवणूक केल्या जात आहे.

              एकंदरीत, हे म्हणणे योग्य ठरेल की ज्या दिवशी या देशातील शेतकरी आणि तरुण खर्‍या अर्थाने जागे होतील; सरकारकडून जनतेला फसवण्याचा खेळ संपेल! मग देशाला गुलामगिरीकडे ढकलण्याचा त्यांचा हेतू आणि खासगीकरणाचे षड्यंत्रही थांबवले जाईल; पण तो दिवस कधी येईल ... तुम्हीच ठरवा..!!